Advertisement
मुंबई: सध्या सोशल मीडियामध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षांचे वेळापत्रक व्हायरल झाले आहे. या व्हायरल वेळापत्रकानुसार मार्चमध्ये या परीक्षा होणार असून पेपरच्या तारखा आणि वेळ देखील यामध्ये देण्यात आली आहे. यामुळे दहावी आणि बारावीच विद्यार्थी गोंधळात सापडले आहेत. त्यांनी शाळांमध्ये या व्हायरल वेळापत्रकासंदर्भात विचारणा केली. पण शाळांकडून याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर २०२१ या शैक्षणिक वर्षातील दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने विद्यार्थ्यांचा निकाल लावण्यात आला. आता राज्यातील करोनाच प्रमाण कमी होताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील ऑफलाइन शाळा सुरु झाल्या आहेत. शाळांमध्ये दहावी, बारावीचे वर्ग देखील नियमित सुरु आहेत. शाळांमध्ये करोना प्रतिबंध नियमांचे पालन केले जात आहे. तसेच विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापुर्वी पालकांची परवानगी आवश्यक आहे. वर्ग नियमित सुरु असल्याने दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा देखील नियमित होईल अशी विद्यार्थ्यांना आशा आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक देखील परीक्षेच्या तयारीत आहेत. दरम्यान अचानक सोशल मीडियात व्हायरल झालेल्या दहावी, बारावीच्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. पण महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या वेळापत्रकाला दुजोरा देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्हायरल वेळापत्रकाकडे लक्ष न देता अभ्यासकडे लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळांने आपल्या अधिकृत वेबसाइटवर दहावी, बारावी परीक्षांसंदर्भात कोणतेही वेळापत्रक जाहीर केले नाही. त्यामुळे अशा व्हायरल होणाऱ्या वेळापत्रकावर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये असे सांगण्यात येत आहे. बोर्डातर्फे लवकरच याप्रकाराबद्दल प्रतिक्रिया आणि वेळापत्रकासंदर्भातील माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/31KBrAB
via nmkadda