Advertisement

म. टा. वृत्तसेवा, डहाणू पालघर जिल्हा परिषदेअंतर्गत नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान आणि इंग्रजी विषयांच्या शिक्षकांची नियुक्ती या शैक्षणिक वर्षात झालेली नाही. त्यामुळे डहाणू, तलासरीसह जिल्ह्यातील एकूण ४१ शाळांत शिकणाऱ्या चार हजार ७६८ विद्यार्थ्यांचे सहा महिन्यांपासून शिक्षकांविना वर्ग सुरू आहेत. लॉकडाउनमुळे ऑफलाइन शिक्षणाचे तीन तेरा वाजले वाजले असताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षतेवर ताशेरे ओढले जात आहेत. पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापासून नववीचा वर्ग सुरू करण्यात आला. त्यानंतर पुढच्याच वर्षी दहावीचे वर्ग सुरू झाले. पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागासाठी मानधन तत्त्वावर गणित, विज्ञान व इंग्रजी या विषयांच्या एकूण १२३ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. या शिक्षकांचे मानधन व अन्य खर्च आदिवासी उपयोजनेच्या नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून करण्यात येतो. त्यानंतर या जिल्ह्यातील ६०पैकी ४१ जिल्हा परिषद शाळेत नववी आणि दहावीचे वर्ग सुरू आहेत. त्यात चार हजार ७६८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र सन २०२१ ते २०२२ या शैक्षणिक वर्षासाठी या विषय शिक्षकांची पुनर्नियुक्ती शिक्षण विभागाने केलेली नाही. त्यामुळे शाळेतील खालच्या वर्गातील अन्य शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात. परंतु नववी आणि दहावीच्या महत्त्वाच्या शैक्षणिक वर्षात गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांच्या तज्ज्ञ शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. लॉकडाउनमुळे ऑफलाइन शिक्षणाचा अभाव होता, आता दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्यानंतर, तरी शिक्षण विभागाने त्याची दखल घेणे आवश्यक आहे, असा सूर व्यक्त होत आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3kZlMnZ
via nmkadda